विद्यार्थ्यांनी आपल्यातील निरागसता व बालपण शेवटपर्यंत टिकवून ठेवावे
न्यायमूर्ती बोमिडवार यांचे प्रतिपादन
- सुरेंद्र इखारे वणी:- पं. जवाहरलाल नेहरूना फुल व मुलं अधिक प्रिय होती. ते मुलांवर व फुलांवर त्यांच्यातील निष्पाप वृत्तीमुळे अतिशय प्रेम करीत होते. त्यामुळे त्यांची जयंती देशभर बालक दिन म्हणून साजरा केल्या जाते. आपले आई वडील हे आपले हित जोपासतात त्यामुळे प्रत्येक बालकांनी दिवसभरातील घटना त्यांना निरागसपणे सांगितल्या पाहिजेत. तुमच्यातील बालपणामुळे तुम्ही निरागस आहात. विद्यार्थ्यांनी आपल्यातील निरागसता व बालपण शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. सुधीर बोमिडवार यांनी केले. ते तालुका विधी सेवा समिती व नगर परिषद शाळा क्र. 7 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालक दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून येथील अधिवक्ता सुषमा क्षीरसागर , अधिवक्ता पूजा मत्ते, अधिवक्ता रेणू गोलेलवार, अधिवक्ता गुरू भोस्कर उपस्थित होते. प्रास्ताविक राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. शाळेतील विद्यार्थिनी अदिती झाडे, एकता शिखरे, लावण्या फाळके, जान्हवी क्षीरसागर यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
सर्वप्रथम अधिवक्ता पूजा मत्ते यांनी बालकांचे हक्क कोणते असतात. वय वर्षं 6 ते 14 पर्यंत मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. बाल कामगार म्हणून त्यांनी राबू नये. त्यासाठी बाल कामगारांच्या विरोधातील कायद्याची माहिती दिली. अधिवक्ता सुषमा क्षीरसागर यांनी मुलांसाठी कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण हा विषय मांडून नागरिकप्रमाणे बालकांनासुद्धा हक्क आहेत. हे स्पष्ट करून बालकांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण कायदे आहेत असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन सिंधुताई गोवारदीपे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी कल्पना मुंजेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर यांनी परिश्रम घेतले.