स्वतंत्र भारताचे धाडसी , इमानदार दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व स्व. लालबहादूर शास्त्री ; पण तेवढेच दुर्लक्षित -विवेक देशपांडे
देशाचा पोशिंदा शेतकरी व देशाच्या सैनिकांचा गौरव करणारे
सुरेंद्र इखारे वणी:-
भारत देश हा नवरत्नांची खाण आहे. या देशांमध्ये अनेक सक्षम आणि प्रचंड मोठ्या कर्तृत्वाचे धनी होऊन गेलेले व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये होऊन गेलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये लालबहादूर शास्त्री यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय साधं परंतु दैदिप्यमान व्यक्तिमत्व होतं पण तेवढेच ते दुर्लक्षित आहे. त्यामुळे लालबहादूर शास्त्री यांचे खरी ओळख भारतीयांना झाली नाही. असे प्रतिपादन विवेक विश्वनाथ देशपांडे यांनी केले. ते विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेच्या 33 वे पुष्पगुफतांना बोलत होते.
या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक उपाध्यक्ष गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते.
उत्तर प्रदेश मधील मोगलसराई येथे 2 ऑक्टोबर 1904 मध्ये जन्मलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्यावर लहानपणीच पितृछाया हरपल्यामुळे बिकट स्थितीचा सामना करावा लागला होता. मामाकडे पूर्ण त्यांचे बालपण गेल्यानंतर त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पूर्ण कुटुंब भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय झालं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे रेल्वेमंत्री झाले होते. परंतु एका रेल्वे दुर्घटनेनंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. त्यानंतर 1961 च्या निवडणुकीनंतर त्यांनी देशाचा गृहमंत्री पद सांभाळलं. पंडित नेहरूंच्या निधनानंतर नऊ मे 1965 ला पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. हे केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या अंगभूत क्षमतेमुळेच या सगळ्या गोष्टी मिळाल्या. परंतु दुर्दैवाने 1965 मध्ये भारताला कमकुवत समजून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. तो हल्ला परतवून लावण्यासाठी देशातील सैनिकांचे मनोधैर्य त्यांनी प्रचंड वाढवून ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. या नाऱ्यातून त्यांनी शेतकरी आणि सैनिक या दोघांचाही गौरव केला होता. त्यावेळेस देश हा एक मोठा संकटात होता त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक उपाय योजना केल्या होत्या आणि त्या यशस्वी झाल्या होत्या. देशवासियांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला होता. युद्धसमयी संपूर्ण जगातून युद्ध थांबवण्याविषयी ज्यावेळेस भारताकडे मागणी होऊ लागली होती त्यावेळेस रशियाच्या मध्यस्थीने ताश्कद येथे पाकिस्तानशी बोलणी करण्यासाठी ते गेले होते आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना मिळालेल्या अल्पशा काळामध्ये त्यांचे साधी राहणीमान देशाप्रती प्रतिबद्धता आणि प्रामाणिकता या गोष्टी त्यांनी देशाला दिल्या.
अध्यक्ष भाषण करताना गजानन कासावार म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रभाषेविषयीचा वाद उफाळून आला होता. त्यावर त्यांनी समाधानकारक तोडगा काढला. ते हरितक्रांतीचे खऱ्या अर्थाने जनक सुद्धा होते. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवणारे ते एक शूर पंतप्रधान होते. त्यामुळेच सैनिकांनी प्रचंड शौर्य गाजवून लाहोरपर्यंत मजल मारली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय जवान जय किसान हे गीत विजय गंधेवार यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन वि.सा. संघाचे सदस्य गजानन भगत यांनी केले. आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे सचिव अभिजीत अने यांनी केले.