रघुवंशम् सर्ग २ चे प्रकाशन संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- महाकवी कालिदासांचे विश्वविख्यात काव्य रघुवंशम् म्हणजे संस्कृत आणि संस्कृती प्रेमींच्या जणू काही गळ्यातील तन्मणी. या महान काव्याचा रसास्वाद आणि त्यातील अनेकानेक वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संस्कृतीच्या पैलूंना सुगम आणि रसाळ मराठी मध्ये उलगडून दाखविणारी म्हणजे रघुवंशम् ही १९ ग्रंथांची मालिका. यातील दुसऱ्या सर्गावर आधारित हा दुसरा ग्रंथ ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर प्रकाशित होत आहे.
महाराज दिलीप यांची निपुत्रिकता, त्यासाठी त्यांनी महर्षी वशिष्ठांचा घेतलेला सल्ला, राजाच्या हातून नकळत झालेली चूक, त्याच्या परिमार्जनासाठी महर्षींनी सांगितलेली गोसेवा, भारतीय संस्कृतीतील गोसेवेचे महत्व, त्यानिमित्ताने हिमालयाच्या सौंदर्याचे लोकविलक्षण वर्णन, नंदिनी नामक कामधेनूच्या कन्येने राजाची घेतलेली परीक्षा, यश आणि वचनपूर्ती या गोष्टी प्राणापेक्षा प्रिय मांडणारी राजाची भूमिका अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या सर्गात अभ्यासायला मिळतात.
संपूर्ण रघुवंशम् वाचणे नाही झाले तरी किमान जे सर्ग निश्चित वाचावेतच असे संस्कृत साहित्याचे अभ्यासक सांगतात त्यापैकी हा पहिला सर्ग.
या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांची प्रकाशित ग्रंथ संख्या ७३ झाली आहे हे विशेष उल्लेखनीय.
अविरत प्रकाशन (90288 68953 )जळगाव द्वारा प्रकाशित या ८६ पृष्ठाच्या पुस्तकाचे मूल्य १०० रुपये असून प्रत्येक संस्कृत आणि संस्कृती प्रेमीने या ग्रंथाचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाशक जयंत कुलकर्णी यांच्या द्वारे करण्यात येत आहे.