प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ –
विनोद ताजणे
सुरेंद्र इखारे वणी :-
आपल्या देशातील लोकशाहीचे चार मजबूत स्तंभ आहेत. त्यातील कायदेमंडळ, प्रशासन, न्याय मंडळ आणि चौथे प्रसार माध्यम हे महत्त्वाचे स्तंभ आहेत. या चारही स्तंभावर सकारात्मक अंकुश ठेवण्याचे काम प्रसारमाध्यम करीत असते. त्यामुळे प्रसार माध्यमे लोकशाहीचे चौथे मजबूत स्तंभ आहे. असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार विनोद ताजणे यांनी केले. ते विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे 34 वे पुष्प गुंफताना प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप व जनतेच्या अपेक्षा या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के हे होते.
आपला विषय पुढे मांडताना विनोद ताजने म्हणाले की, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वात आधी छोटी छोटी वृत्तपत्र निघत होती. त्यानंतर रेडिओ ची सुरुवात झाली. रेडिओ नंतर दूरचित्रवाणी आल्यामुळे प्रसारमाध्यमांचे जाळे निर्माण झाले. त्यानंतर मोबाईल हातात आल्यामुळे त्याचे जागतिकीकरण झाले. या प्रसार माध्यमांमध्ये वृत्तपत्राची विश्वासार्हतता अजूनही टिकून आहे ही आनंदाची बाब आहे. वृत्तपत्राचा कणा हा बातमीदार असतो. बातमीदारांमध्ये चौकसपणा, उत्तम सामान्य ज्ञान, सामाजिक संबंध, विश्वासार्हतता, तत्परता व निर्भीडपणा असणे आवश्यक आहे. अन्यायाच्या विरोधात सतत चालणारी लढाई म्हणजे पत्रकारिता आहे. या लढाईने आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठी भूमिका बजावली होती. पत्रकाराकडून जनतेच्या सुद्धा खूप अपेक्षा आहेत. सर्वसामान्यांना वाटते की, पत्रकाराने राष्ट्र निर्माण कार्यात विधायक भूमिका पार पाडावी. त्यांनी जनतेसमोर सत्य व वास्तव मांडावे. आपला दृष्टिकोन त्यांनी सकारात्मक ठेवूनच लिखाण करावे. या लिखाणामुळे कोणावर अन्याय होईल अशी भूमिका घेऊ नये. परंतु दुर्दैवाने आजच्या प्रसार माध्यमाचे स्वरूप हे अतिशय गुंतागुंतीचे झालेले आहे. निर्भीड पत्रकारिता लुप्त होत आहे. पीत पत्रकारितेला अधिक महत्त्व मिळत आहे. पत्रकारांना लिखाणाचे स्वातंत्र्य कमी झालेलं आहे. त्याची लेखणी मोकळी नाही. या सगळ्यांमध्ये जाहिरातीला अधिक महत्त्व असल्यामुळे कुठेतरी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा द्विधा मन:स्थिती पाहायला मिळते आहे.
अध्यक्ष भाषण करताना अशोक सोनटक्के म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा प्रहरी असतो. त्याने आपले कर्तव्य निभावले की समाजाची घडी नीट राहत असते. ते त्यांनी करावे अशी समाजाची अपेक्षा असते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथरडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय गजानन कासावार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ स्थानिक शाखेचे सचिव अभिजीत अणे यांनी केले. आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले.
प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ – विनोद ताजणे
![सुरेंद्र इखारे](http://wani24news.com/wp-content/uploads/2022/11/Ekare.jpeg)
सुरेंद्र इखारे
संपादक![जयंत साठे](http://wani24news.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Image-2022-12-07-at-10.24.33-AM.jpeg)