समाजामध्ये ज्येष्ठाचे महत्व अधोरेखित आहे – सुरेंद्र पवार
नागपूर ( जयंत साठे) समाजामध्ये, कुटूंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींना फार महत्वाचे स्थान आहे. पूर्वी एकत्र कुटूंब पद्धत होती परंतु आता मुले शिकायला किंवा नोकरीनिमित्ताने घरापासून दूर जातात त्यामुळे घरच्या ज्येष्ठ वृद्ध लोकांकडे दुर्लक्ष होते. त्यांचा सांभाळ करणे त्यांना शक्य होत नाही या बाबी लक्षात घेऊन शासनाने वृद्धाची परवड होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी सन 1995 ला पहिले मातोश्री वृद्धाश्रम सुरु केले. आता शासनामार्फत अनेक विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. ज्येष्ठ नागरीक हे विचारांचे संक्रमण करण्याचे महत्वाचे साधन आहे. त्यांचे महत्वपूर्ण विचार व अनुभव हे ते आपल्या मुलांमार्फत समाजापर्यंत पोहोचवत असतात असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार यांनी आपले अध्यक्षीय भाषणात केले.
सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजित सदर कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपयुक्त प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य डॉक्टर मंगेश वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
भारत हा युवकांचा देश आहे. आजचा युवक हा उद्याचा ज्येष्ठ नागरीक आहे. त्यांच्या अनुभवनांचा प्रचंड मोठा खजिना आपल्याला मिळतो त्यांचा सन्मान करायला पाहिजे. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती प्रसाद कुळकर्णी यांनी दिली. यावेळी नागपूर जिल्हा परीषदेच्या समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती, सहाय्यक लेखा अधिकारी संजय पोलके, विशेष अधिकारी नंदकिशोर भूडके, ज्येष्ठ नागरीक मनोहर खर्चे, सुरेश रेवतकर तसेच तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी म्हणून विद्या कांबळे व आचल वर्मा इ. उपस्थित होते.
सदर कार्यक्रमादरम्यान श्रीमती विभावरी टिकेकर, मनोहर खर्चे, सुरेश रेवतकर, राजू मिश्रा, चंद्रपाल सोनटक्के, काशिनाथ धांडे इ. ज्येष्ठ नागरीकांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक लेखाधिकारी संजय पोलके यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग हा समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी कार्य करते सर्व स्तरातील लोकांना आपल्यात सामावून घेते याचेच उदाहरण या कार्यक्रमात आज दिसून आले. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संचालन तृतीयपंथीय तनुश्री गिरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.




