डॉ.स्वानंद गजानन पुंड यांची नवीन ग्रंथमालिका
“हितोपदेश “डॉ उमा जोशी बोडस यांचे ; उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी :- प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारी रचना म्हणजे कथा. आबालवृद्ध सगळ्यांनाच आवडणाऱ्या कथा नीतिशिक्षणाचे सर्वात सुलभ आणि प्रभावी माध्यम आहे हे लक्षात घेत अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. यापैकी एक विश्वविख्यात ग्रंथ म्हणजे हितोपदेश. ग्रंथाच्या नावातच यात हिताचा उपदेश केलेला आहे हे स्पष्ट होते. पशुपक्षांच्या कथांच्या माध्यमातून वैश्विक जीवन मूल्यांची अलगद रूजवण करणाऱ्या या कथांचे मूळ संस्कृत स्वरूप, त्यातील असंख्य सुभाषिते हा अनेक संस्कृती प्रेमींच्या आकर्षणाचा विषय असला तरी आजवर या विषयावर सुगम, सुबोध मराठी मध्ये विस्तृत विवेचन उपलब्ध नसल्याने होणारी अडचण दूर करणारी प्रसाद प्रकाशन पुणे ची नवीन ग्रंथ मालिका हितोपदेश.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभाग प्रमुख स्वरूपात कार्यरत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या निरूपणातून ही चार ग्रंथांची मालिका साकार होणार आहे.
मित्रलाभ, सुहृद्भेद, विग्रह आणि संधी अशा या मूळग्रंथातील चार प्रकरणांवर चार विवेचनात्मक ग्रंथ प्रकाशित होतील. त्यापैकी मित्रालाभ या पहिल्या ग्रंथाचे आज गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर प्रकाशन होत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विषयांमध्ये आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट जीओईसी अभ्यासक्रमामध्ये यांचा समावेश करण्यात आला असल्याने संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील विज्ञान आणि वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना देखील या वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास विषय स्वरूपात आस्वाद घेता येणार आहे.
कथा कशी आहे? यापेक्षा ती तशी का आहे? हे उलगडून दाखविण्यावर या ग्रंथ मालिकेचा भर असणार आहे. त्या सुभाषितांमागे असणारे संदर्भ, त्यात अपेक्षित असणाऱ्या कथा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील परिभाषा, त्या सुभाषिताच्या किंवा कथानकातील उद्गारांच्या मागे बोलणाऱ्याचा असणारा नेमका भाव, आजच्या काळात आपल्याला त्या उपदेशाची असणारी उपयुक्तता या विविध दृष्टीने हे विवेचन वैशिष्ट्यपूर्ण आहे.
प्रत्येक भारतीय संस्कृती प्रेमी आणि आपल्या घरातील नवीन पिढीवर भारतीय नीतिसंस्कार करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने या उपक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन प्रसाद प्रकाशनच्या संचालिका डॉ. उमा जोशी बोडस यांनी केले आहे.