स्वराज्य कसं असावं याचा आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज – आमदार संजय देरकर
महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार वणीच्या शिवतीर्थावर शिवजयंती उत्साहात साजरी
सुरेंद्र इखारे वणीः
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वणी नगर पालिकेद्वारा शिवतीर्थावर शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, तहसिलदार निखिल धुळधर, नायब तहसिलदार अशोक ब्राह्मणवाडे, रामचंद्र खिरेकर, वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुंबडे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. नंतर महाराष्ट्रगीत घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी मांडली. त्यानंतर तेजस्विनी गव्हाणे हिच्या शिवगर्जनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नगर परिषद शाळा क्रमांक 7 चे विद्यार्थी सार्थक लाटकर व वैष्णवी सुदामा बघेल यांनी छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले. तसेच दिगंबर ठाकरे या शिक्षकांनी शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला.
वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची देदीप्यमान कारकीर्द प्रस्तुत करून ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी संपूर्ण विश्वाला स्वराज्याचा आदर्श दिला. त्यांच्या राज्यात जनतेसोबतच स्त्रिया शेतकरी आणि सामान्य माणूस सुरक्षित होता. प्रगतीपथावर होता. आज छत्रपती शिवरायांच्या कार्याची नव्या समाज बांधणीसाठी गरज आहे.
अध्यक्षीय भाषण करताना संजय देरकर म्हणाले की, स्वराज्य कसं असावं याचा आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतुन दिसून येते आणि हा उत्सव मराठी जणांचा उत्सव आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजाननराव कासावार यांनी केले यावेळी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी वणी नगर पालिका प्रशासनाणे घेतली.