▫️जनतेचा मूलभूत अधिकार व सुरक्षेसाठी शहीद भगतसिंगांचा संघर्ष होता – कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी
▫️राजूर येथे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन
____________________
सुरेंद्र इखारे वणी – : शहीद भगतसिंग इंग्रजांविरुद्ध लढत असताना त्यांचा संघर्ष निव्वळ इंग्रजाांपासून स्वातंत्र्य मिळविण्यापुरता नव्हता तर या देशात कोणत्याही व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्ती कडून शोषण होऊ नये, जनतेचे मूलभूत अधिकार त्यांना मिळाले पाहिजे, जनतेला त्याचे हक्क प्राप्त करण्यासाठी संघटित होऊन त्याला संघर्ष करण्याचे अधिकार अबाधित असावे यासाठीचा त्यांचा संघर्ष होता आणि त्यासाठीच सन १९२९ साली संसदेमध्ये जनविरोधी जनसुरक्षा विधेयक ( public safety bill ), व कामगार विरोधी ट्रेड डिस्प्यूट बिल हे विधेयक ठेवल्या जाणार होते त्याचा विरोध करण्यासाठीच भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकून आणि ह्या विरोधातील पत्रके टाकून स्वतःला अटक करवून घेतली होती. यावरून त्यांचा संघर्ष कशासाठी होता हे लक्षात येते, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा शहीद दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी केले.राजूर येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांचा तैलचित्राला सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड पेरकावार व मो. असलम यांच्या हस्ते देशातील युवकांचे आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळेस डेव्हिड पेरकावार, जयंत कोयरे, महेश लिपटे, कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी उपस्थितांना भगतसिंगाचे विचार व कृती याबद्दलची माहिती दिली.
या झालेल्या छोटेखाणी अभिवादन कार्यक्रमात गावातील गायक कलाकार राजेंद्र पुडके व नागो काळे ह्यांनी क्रांतिकारी गाणे म्हणून उपस्थितांमध्ये जोश जागविला.
या अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने पोलिस पाटील वामन बलकी, अशफाक अली, कैलास पाईकराव, अजय भुसारी, राकेश इग्रपवार, संजय कवाडे, स्नेहल वाळके, जब्बारभाई, पंधरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.