शत्रूच्या यातणांचा सामना करणारे अद्वितीय छत्रपती संभाजी राजे –
तेजस्विनी गव्हाणेसुरेंद्र इखारे वणी:
केवळ 32 वर्षाच आयुष्य लाभलेले, 16 भाषेचं ज्ञान असलेले नऊ वर्षाच्या काळात 120 युद्ध लढून जिंकलेले छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव द्वितीय होते. औरंगजेब सारख्या शत्रूच्या ताब्यात 40 दिवसाच्या प्रचंड यातना सोसल्यानंतर सुद्धा मुघलांच्या मागणीला भिक न घालता शेवटच्या श्वासापर्यंत न झुकणारे छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या समाजासाठी एक आदर्श महापुरुष होते. असे प्रतिपादन अकराव्या वर्गातली तरुण विद्यार्थिनी तेजस्विनी गव्हाणे हिने केले. ती विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेच्या 42 वे पुष्प गुंफतांना बोलत होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर हे होते. अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहलता चुंबळे यांनीं संभाजी महाराजाच्या बलिदानावर देव देश अन् धर्मासाठी तुम्ही दिले प्राण, विसरू कसे बलिदान हे गीत सादर केले. त्यानंतर स्वा. सावरकरांनी रचलेले सागरा प्राण तळमळला हे गीत विजय गंधेवार यांनी सादर केले.
आपला विषय पुढे मांडताना तेजस्विनी म्हणाली की, दोन अडीच वर्षाचे वय असताना संभाजी महाराजांवरील मातृछत्र हरवले. माँ जिजाऊच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी बुध भूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. परंतु त्यांना त्यांच्या जीवनात बाह्य शत्रू बरोबर अंतर्गत शत्रूशीहीं सामना करावा लागला. स्वराज्यावर प्रचंड सैन्य घेऊन चाल करून आलेल्या औरंगजेबाला रणांगणावर जेरीस आणलेल्या संभाजी महाराजांना आप्तस्वकीयांनीच गद्दारी करून पकडून दिले. 40 दिवसांच्या हाल अपेष्ठा सहन केल्या पण महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. धर्म, देश आणि आपल्या स्वराज्यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिले.
अध्यक्षीय भाषणातून राजाभाऊ पाथ्रडकर यांनी जीवनातील लढाऊ वृत्ती व बाणेदारपणे जगलेले जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव सरपटवार यांनी केले. सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ स्थानिक शाखेचे सचिव अभिजित अणे यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले.