‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रम
महाविद्यालयातील स्वच्छता सैनिकाचा सत्कारसुरेंद्र इखारे वणी :-
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार 19 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये” स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक जीवनशैली बरोबर पर्यावरणीय व सामाजिक मूल्य जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत 22 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासावर डॉ. गजानन सोडनर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. उद्योगी, चारित्र्यसंपन्न व कर्तुत्वान पिढी निर्माण होण्यासाठी महाराजांचे विचार कसे उपयुक्त आहेत हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रवीण कुलकर्णी उपस्थित होते. आजच्या आधुनिक जीवनशैलीच्या काळात होत असलेला भौतिक विकास हा नेत्र दीपक जरी असला तरी पर्यावरणीय दृष्टिकोनातून अधिक समस्या निर्माण होताना दिसतात. वाढता इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर,प्लास्टिकचा वापर यातून निर्माण होणारा घनकचरा पर्यावरणीय दृष्टिकोनातून प्रचंड घातक होत आहे. पाणी, हवा व मृदा या कचऱ्यामुळे प्रदूषित होत चालली आहे. या समस्येतून कसा मार्ग काढायचा यासाठी महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रा. अक्षय जेनेकर यांनी “शून्य कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर” या विषयावर चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर रोजी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी डॉ. विनोद चव्हाण हे अध्यक्ष होते. त्यांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेत विद्यार्थ्यांची कर्तव्य व त्यांची भूमिका समजावून सांगितली. या प्रसंगी महाविद्यालयातील स्वच्छता सैनिक श्री. भीमाभाऊ आत्राम यांचा रा. से. यो. च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता रा. से.यो. समन्वयक डॉ. बाळासाहेब देशमुख तसेच महाविद्यालयातील रा.से. योजनेचे स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




