शेतकऱ्यांचा हरभरा लागवडीकडे कल
जयंत साठे नागपूर : परतीच्या पावसाने खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने पुरता खचलेल्या शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात हरभरा (चना) लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.हरभरा हे थंड हवामानाला अनुकूल रब्बी पीक असून ओलिताखालील देशी हरभऱ्याची पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत केल्यास चांगली उगवण होते. आणि मर रोगाचा धोका कमी होतो. पूर्व विदर्भ विभागात १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पेरणी करावी ,असे आवाहन कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे. या महिन्यात थंड हवा आणि जमिनीत ओलावा असतो, जो पिकाला फायदेशीर आहे. बागायती शेतकऱ्यांसाठी अजूनही पेरणीची संधी आहे. परंतु जास्त उशीर करणे धोकादायक आहे.
रब्बी हंगामात हरभरा काबुली, हरभरा गुलाबी, राजमा, मूग, व उडीद पीक घेण्यात येते. खोडमाशी व इतर किडींचा त्रास जाणवल्यास योग्य पद्धतीने फवारणी करावी. या पिकास पाण्याचा टंचाई पडू देऊ नये. पिकाला ६ ते ७ ओलित करावे. सर्व कडधान्य बियाण्याला रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी तसेच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी नाशकाची पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करावी, अशी माहिती गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माया खोब्रागडे यांनी “लोकवाहिनी” सोबत बोलतांना दिली.




