राजूर(गोटा) हे गाव मोहरम सणा निमित्ताने धार्मिक परंपरेचे जतन करते – वैजनाथ खडसे.
सुरेंद्र इखारे वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या झरीजामनी तालुक्यातील राजूर(गोटा) हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर चंद्रपूर आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्याच्या त्रिवेणी संगमावर पैनगंगा नदीच्या काठावर सुमारे 350लोकसंख्या असलेले छोटेसे गाव आहे. या गावात मुस्लिम बांधवांचे एकच घर वर्षभर कुलूपबंद असते . परंतु हजरत इमाम हुसेन यांच्या पवित्र स्मृतिदिना प्रित्यर्थ मोहरम हा सण साजरा करण्यासाठी येतो. यानिमित्याने संपुर्ण गावातील विविध जातीधर्मातील लोक एकत्र येऊन मोहरम हा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करून सामाजिक ऐक्य जोपासते हीच या गावातील सामाजिक सलोखा व बंधुभाव ही ओळख बनली आहे.या छोट्याशा गावात कुणबी, महार, आदिवासी गोंड, धोबी खाती वाढई यासह विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.या छोट्याशा गावातून आज 50हून अधिक युवक व दहा हून अधिक ज्येष्ठ सेवानिवृत्त महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच विविध क्षेत्रात जबाबदारीची पदे भूषवत समाजसेवा करत आहे. हे गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचे द्योतक आहे.
राजूर (गोटा) हे गाव सामाजिक ऐक्याचे आणि सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण ठरते. एकही मुस्लिम बांधव नसतानासुद्धा हिंदू बांधव अत्यंत श्रद्धेने ताबूत तयार करतात. वर्षातून एकदा येणारा मोहरम हा सण गेल्या कित्येक वर्षांपासून राजूर(गोटा), हिरापूर मांगली या भागातील लोक सामाजिक वीण घट्ट करतात. या सना निमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मिरवणूक काढतात. एकमेकांना प्रसाद वाटून. दुःख व त्यागाच्या या दिवसात बंधुत्वाचा संदेश देतात.
याची प्रचिती विशेषतः मोहरम उत्सवाच्या निमित्ताने येते. इस्लाम धर्मातील मोहरम हा वर्षातील पहिला महिना असून त्याचा दहावा दिवस जगभरात विशेष महत्त्वाने पाळला जातो. काही समुदाय हा दिवस श्रद्धा आणि स्मरणाचा मानतात तर काही ठिकाणी तो उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो.
राजूर (गोटा) आणि परिसरातील 50किलोमीटर क्षेत्रात मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेष बाब म्हणजे गावात मुस्लिम समाजाची वस्ती नसतांनाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात (सवारी ), (डोला) यासारख्या परंपरा जोपासली जाते. मोहरमच्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येते.
या उत्सवातून केवळ धार्मिक परंपरेचे जतन होत नाही तर सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि मानवतेचा संदेशही दिला जातो. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य राजूर (गोटा) गावाने आपल्या कृतीतून जपले असून, आजच्या काळात हे गाव समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.





